या प्रकरणामध्ये गेल्या वर्षभरातील व्यवहारांचे लेखा परीक्षण पाटेकर यांनी केले. त्यानुसार यामध्ये जवळपास ३३ लाख रुपयांपर्यंत अधिक रकमेचा वेगवेगळी कारणे देऊन अपहार केला आहे. यात ज्या सात सदस्यांवर कर्ज नव्हते, अशा सदस्यांच्या नावावर १ कोटी ४६ लाख रुपयांची बाकी दाखविण्यात आली, तसेच मर्चंट बँकेतूनही चार धनादेशाद्वारे १ लाख २५ हजार रुपये उचल केले आहेत. याव्यतिरिक्त वेगवेगळी कारणे दाखवून १३ लाख ६० हजार रुपयांच्या रकमेचा हिशोब लागत नसल्याचे दिसून येते. दरम्यान, कर्ज खात्यांवर दुहेरी एंट्री न करता ८ लाख ३५ हजार ५०० रुपये रोखीने कर्जवाटप करून त्याची लेखा बुकमध्ये नोंद न घेता ती दुसरीकडे घेतली आहे. एकूणच अशी वेगवेगळी कारणे देऊन सचिव भास्कर अवचार यांनी हा घोटाळा केला आहे.
विशेष म्हणजे अवचार यांनी हा घोटाळा केल्याचे मान्य करून तसे लेखी पत्रही दिले आहे. ही सर्व रक्कम भरण्यास आपण तयार असल्याचे शपथपत्र अवचार यांनी दिले आहे. ही एवढी मोठी रक्कम त्यांनी कुठे खर्च केली याचा मात्र तपशील अद्याप समजू शकला नाही.
९४ लाखांचे दुसरे प्रकरण
आज या पतसंस्थेत प्रथमदर्शनी ३३ लाख रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी अवचार यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याआधीदेखील या पतसंस्थेत अशाच प्रकारे ९४ लाख रुपयांचे प्रकरण गाजत असून, त्यात आणखी गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात येते; परंतु लेखा परीक्षण अहवालात यावर ताशेरे ओढले आहेत. जिल्हा सहनिबंधक नानासाहेब देशमुख, जालना तालुका सहायक निबंधक रामेश्वर वरखडे यांनी यात गंभीरपणे लक्ष घालून ही कारवाई केली.