वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. बंटेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना बोराडे म्हणाले की, पीक उत्पादनात मधमाश्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असून मधमाश्या संपल्यास काहीच शिल्लक राहणार नाही, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मधमाशी स्वतःसाठी काहीच करीत नाही, मध गोळा करते दुसऱ्यासाठी, परागीभवन करते, इतकेच नाही तर मधमाशीच्या विषाचा वापर सुद्धा औषध म्हणून केला जातो, असे ते म्हणाले.
डॉ. एस. डी. बंटेवाड म्हणाले की, मधमाशीचा वापर परागीभवनासाठी करावा. मधमाशीच्या वापरामुळे पीकनिहाय उत्पादनात ५२ ते ९३ टक्के वाढ होते, असे ते म्हणाले.
परभणी कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मधमाश्यांच्या विविध प्रजाती, त्यांचे महत्त्व, जीवनशैली, मध गोळा करण्याच्या पद्धती, शुद्ध मध कसा ओळखावा, मध व्यवसायाचे अर्थशास्त्र याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचे संचालक आर. डी. पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. लातूर येथील मध उद्योजक दिनकर पाटील यांनी आपले अनुभव कथन केले. मधमाशीकडे केवळ व्यावसायिक दृष्टीने न पाहता मधमाश्यांचे महत्त्व लोकांना समजावून सांगावे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी प्रास्ताविक केले. कीटक विषयक तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी सूत्रसंचालन केले.