जालना : नगरसेविका संध्या देठे यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन मदत केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची योजनांसाठी होणारी धावपळ थांबणार आहे. या मदत केंद्रातून सर्वसामान्य नागरिकांना आता चांगली सुविधा मिळेल, त्यांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
शहरातील प्रभाग क्रमांक २३ च्या नगरसेविका संध्या देठे यांनी नागरिकांना ऑनलाइन सेवा देण्यासाठी रेल्वे स्टेशन रोडवर सुरू केलेल्या मदत केंद्राचे उद्घाटन दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, प्रा. दिलीप अर्जुने, बाबासाहेब कोलते, नीलेश वानखेडे, सुखदरसिंग चव्हाण, ओम कुलकर्णी, विकास खरात, निवृत्ती दिघे, राजू मिठे, सचिन तपसे, संतोष ढगे आदींची उपस्थिती होती.
केंद्र शासनाच्या स्वनिधी योजनेंतर्गत प्रभागातील प्रत्येक नागरिकांना नगर परिषदेतील व केंद्र शासनाच्या योजनांची माहिती या मदत केंद्रातून दिली जाणार आहे. तसेच नागरिकांना ऑनलाइन व इतर अर्ज भरण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे नगरसेविका देठे यांनी सांगितले.