जालना शहरातील अत्यंत महत्वाच्या जागेवर जालना पालिकेचे महात्मा फुले मार्केट आहे. परंतु मध्यंतरी ही इमारत मोडकळीस आल्याने ते २००९ मध्ये पाडण्यात आले होते. त्यामुळे या बाजाराचे नुतनीकरण रखडले आहे. या प्रकरणी आ. कैलास गोरंट्याल यांनी मध्यस्ती करून ही इमारत नव्याने उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार यात दोन प्रस्ताव तयार करण्याचे राज्य सरकारचे म्हणणे होते. त्यानुसार कागदोपत्री दुकानांचा नकाशा काढून त्या कागदावरच लिलाव करून दुकानांची जागा आणि आकार निश्चीत करून नंतर बांधकाम करणे, किंवा इमारत बांधून नंतर त्या दुकानांचा लिलाव करणे, परंतु सध्या पालिकेकडे इमारत बांधून नंतर दुकानांचा लिलाव करण्यासाठीची पुरेशी आर्थिक तरतूद नाही.
त्यामुळे कागदोपत्री लिलाव करून त्यातून ज्यांना दुकान घ्यायचे आहे, त्यांच्याकडून एक ठरावीक रक्कम जमा करून नंतर त्यांना दुकान बांधून देण्यात येणार आहे. एकूणच या आधी देखील ही इमारत बांधण्यासाठी पीपीई तत्वावर तीन वेळेस पालिकेने टेंडर काढले होते. परंतु त्यातील निकषांमुळे एकही कंत्राटदार ते टेंडर भरण्यासाठी पुढे आला नसल्याने हे भिजत घोंगडे कायम आहे.
शासनाच्या मान्यतेकडे लक्ष
जालना पालिकेने महात्मा फुले मार्केटचा प्रस्ताव कागदोपत्री नकाशा तयार करून नंतर त्याचे बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळावी असा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्याला मंजूरी मिळाल्यावर त्याचा डीपीआर तयार करून ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी जालना.