जालना : शहरातील चौधरीनगर परिसरात मंगळवारी दुपारी एका ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. सदरील महिलेची ओळख पटली असून, या महिलेचा खून जमिनीच्या वादातून लहान भावानेच केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी संशयित आरोपी दीपक पटेकर यास ताब्यात घेतले आहे.
कमलाबाई शाहूराव कोल्हे (५५ रा. खापोली, मुंबई) असे मृत महिलेचे नाव आहे. कमलाबाई कोल्हे यांना तीन भाऊ व तीन बहिणी आहे. त्यांच्या वडिलांची अंबड तालुक्यातील आपेगाव येथे दीड एकर जमीन आहे. सदरील जमीन त्यांच्या मधल्या भावाने आपल्या नावावर केली होती. हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते. यावर दोन दिवसांपूर्वीच अंबड येथील न्यायालयात सुनावणी होती. यासाठी कमलाबाई कोल्हे या मुंबई येथून चंदनझिरा येथील मोठ्या भावाकडे आल्या होत्या. खरपुडी येथील लहान भाऊ दीपक पटेकर हादेखील चंदनझिरा येथे आला होता. सोमवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दीपक पटेकर हा कमलबाई यांना घेऊन चौधरीनगर परिसरात गेला होता तेथेच त्याने गळा दाबला तसेच दगडाने मारून कमलाबाई यांचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाले, पोनि. बागुल, पोलीस उपनिरीक्षक बघाट, पोलीस उपनिरीक्षक बोंडले, पोलीस कर्मचारी अनिल काळे, चंद्रकांत माळी आदींनी केली आहे.
असा झाला उलगडा
मोठ्या भावाने चंदनझिरा पोलीस ठाण्यात कमलाबाई कोल्हे या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यातच चौधरीनगर परिसरात ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता, सदरील मृतदेह हा कमलाबाई कोल्हे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. अधिक तपास केला असता, सोमवारी रात्री ७ ते १ वाजेपर्यंत दीपक पटेकर हा घरी नसल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता, त्याने खुनाची कबुली दिली.