नेर : पालकमंत्री राजेश टोपे हे नेर येथील १३२ केव्हीचे उपकेंद्र इतरत्र हलविण्याचा घाट घालत असल्याचा आरोप करीत भाजपच्या वतीने शनिवारी नेर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांच्यासह इतर आंदोलकांनी टोपे यांच्यावर टीकेचा भडीमार करीत उपकेंद्र इतरत्र हलविण्यास विरोध करीत त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली.
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्ह्यात विजेचे जाळे निर्माण व्हावे यासाठी जालना व परतूर येथे २२० केव्ही, नेर येथे १३२ केव्ही यासह जिल्हाभरात ४९- ३३ केव्ही मंजूर केल्या होत्या. त्यातील जवळपास सर्वच ते २३ केव्ही सुरू झाल्या असून, शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न बऱ्यापैकी संपवण्याचे काम लोणीकर यांनी केल्याचे यावेळी सांगण्यात आले. नेर येथील १३२ केव्ही उपकेंद्र सत्तेचा गैरवापर करून हलविण्याचा घाट पालकमंत्री राजेश टोपे यांनी घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पालकमंत्री टोपे यांनी स्वत: निधी मंजूर करून आणावा व त्या माध्यमातून विजेचे जाळे निर्माण करावेत, असे प्रा. सहदेव मोरे यावेळी म्हणाले. हा प्रकल्प येथून हलविला तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, पालकमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण केले जाईल, असा इशाराही मोरे यांनी दिला. चौकट
प्रकल्प कार्यान्वित करावा
जालना येथील कन्हैयानगरमधील १३२ केव्ही केंद्रातून नेर, मानेगाव, सेवली ३२ केव्ही केंद्राला विजेचा पुरवठा होतो. पावसाळ्यात सतत वीज पुरवठा खंडित होतो. परिणामी या भागातील शंभरावर गावे, तांडे, वस्ती, वाड्यांवरील नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी नेर येथील प्रकल्प तत्काळ सुरू करून रामनगर, नेर, बाजीउम्रद, सेवली, मौजपुरी, पांगरी गोसावीसह परिसरातील गावांचा विजेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
फोटो