जालना : तालुक्यातील घाणेवाडी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली भागवतबापू बावणे यांनी वर्चस्व राखले आहे. त्यांच्या पॅनलच्या राधाबाई पंडित पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
जालना तालुक्यात सरपंचपदासाठी घाणेवाडी ग्रामपंचायत ही एकमेव अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होती. बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदासाठी निवडणूक झाली. याप्रसंगी अध्यासी अधिकारी तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी सी.एल. राठोड तसेच ग्रामसेविका अलका धांडे यांची उपस्थिती होती. यावेळी राधाबाई पवार यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भागवतबापू बावणे यांनी सांगितले की, गत पंचवार्षिकमध्ये केलेल्या विकास कामांची ही पावती असून, सर्वांच्या सहकार्याने विकास निधी खेचून आणून भरपूर कामे केली जाईल. तर नवनिर्वाचित सरपंच राधाबाई पवार यांनी आरक्षणाचे महत्त्व विशद केले. लहान-मोठ्या समस्याची पूर्ण जाणीव असून, आपण महिलांसाठी विशेष काम करू, असेही त्या म्हणाल्या. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन
जालना तालुक्यातील घाणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राधाबाई पंडित पवार यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना प्रमाणपत्र वितरित करताना अध्यासी अधिकारी सी.एल. राठोड, ग्रामसेवक अलका धांडे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष भागवतबापू बावणे आदी.