राजूर : जागतिक निसर्ग निधी व कृषी विज्ञान केंद्र खरपुडी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्पांतर्गत भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे जनजागृतीपर कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. बीसीआय प्रकल्पाचे उत्पादक गट व्यवस्थापक पांडुरंग जऱ्हाड व क्षेत्रीय सहायक उद्धव बनकर, माधवी बनसोडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जऱ्हाड यांनी येणाऱ्या हंगामात कापूस पिकावर पडणाऱ्या गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी आतापासूनच शेतकऱ्यांनी तयारी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अळीच्या जीवनक्रमामध्ये खंड पडण्यासाठी शेतकऱ्यांनी सध्या शेतात उभे असलेले कपाशीचे पीक, कपाशीचे अवशेष लवकरात लवकर काढून घेणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी फरदड कापूस घेण्याचा मोह टाळून उभे पीक काढून टाकण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, गावातील शेतकऱ्यांनी १५ जानेवारीपर्यंत शेतातील कपाशीचे पीक नष्ट करण्याची ग्वाही दिली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
फोटो ओळ : पळसखेडा पिंपळे येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना पांडुरंग जऱ्हाड व उद्धव बनकर.