वडीगोद्री/ अंकुशनगर : जिल्ह्यातील अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे असून, कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यावर याबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील साखर कारखान्यांना उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.
या बैठकीस पालकमंत्री राजेश टोपे, साखर आयुक्तांचे प्रतिनिधी पांडुरंग शेळके, विशेष लेखा परीक्षक रशीद शेख यांच्यासह शेजारील जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सोमवारी ही बैठक घेण्यात आली. समर्थ कारखान्याच्या कार्यक्षेत्रात साडेसात लाख मेट्रिक टन ऊस अतिरिक्त आहे. शिवाय जिल्ह्यातही उसाचा अतिरिक्त प्रश्न गंभीर आहे. या उसाचे गाळप करण्यासाठी चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर बारामती अॅग्रोने दीड लाख मे. टन, रामेश्वर सहकारी कारखाना भोकरदन ५० हजार मे टन, गंगामैया अॅग्रोने १ लाख मे टन, छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग ५० हजार मे टन, मुक्ताईनगर शुगर्स ३० हजार मे टन, लक्ष्मी नरसिंह शुगर्स परभणी २५ हजार मे टन, जय महेश शुगर्स माजलगाव ३ लाख मे टन, समृद्धी व घृशनेश्वर शुगर्स २ लाख मे. टन व शरद शुगर्स पैठणने ४० हजार मे. टन याप्रमाणे उसाचे गाळप करावे, असे उद्दिष्ट देण्यात आले.
तोड यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे
उद्दिष्ट निश्चित झाले मात्र प्रत्यक्ष तोड यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश किती कारखाने पाळतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रत्यक्षात केवळ बारामती अॅग्रो लिमिटेड कन्नड येथील कारखान्याची यंत्रणा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कारखान्याच्या ५५ टोळ्या असून, ७० ट्रकमार्फत दररोज बाराशे मेट्रिक टन ऊस गाळपासाठी घेऊन जात आहे.