टेंभुर्णी : सध्या शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वात मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेले विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन चांगलेच पेटले असून, १० फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलक शिक्षकांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात जालना जिल्ह्यातून शेकडोंच्या संख्येने शिक्षक सहभागी झाले आहेत.
राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, घोषित अनुदान मंजूर तथा अंशत: अनुदानित, अघोषित शिक्षकांचे एकत्रितपणे हे आंदोलन मागील २९ जानेवारीपासून सुरू झाले आहे.
१३ सप्टेंबर २०१९च्या शासन निर्णयानुसार घोषित अनुदान मंजूर २० टक्के व वाढीव ४० टक्के वेतन वितरणाचा आदेश प्रचलित धोरणाने तात्काळ काढावा तसेच सर्व अघोषित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय निधीही घोषित कराव्यात या मागण्यांसाठी हजारो शिक्षक आझाद मैदानावर जवाब दो बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र सरकार मात्र या आंदोलनास फारसे गांभीर्याने घेत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिल्याचे समन्वय समितीचे जालना जिल्हा समन्वयक ज्ञानेश चव्हाण यांनी मंगळवारी लोकमतला सांगितले.
या आंदोलनात जालना जिल्ह्यातून शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक दीपक कुलकर्णी, ज्ञानेश चव्हाण, के.पी. पाटील, नेहा गवळी, राहुल कांबळे, संतोष वाघ, शिवराम म्हस्के, अनिल परदेशी, ज्ञानेश्वर शेळके, सदानंद लोखंडे, सुनील गोरे, प्रदीप भोपळे, उमेश पिपळे, गणेश सुराशे, देवीदास बोर्डे, शिवाजी वाघ, फाकरू कुरेशी, गजानन बुरकुल, कैलास टाले, रामू शेवत्रे आदींसह शेकडो शिक्षक मागील मागील १२ दिवसांपासून आझाद मैदानावर ठाण मांडून बसले आहेत.
फोटो- मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले जालना जिल्ह्यातील शिक्षक.