कोरोना रुग्णसंख्या घटल्याने जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा पाच अंकांच्या आत आला होता. तसेच ऑक्सिजचा पुरवठा आणि ऑक्सिजनचे बेड हे निर्धारित निकषांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणावर रिक्त होते. त्यामुळे जालना जिल्ह्यात सर्व व्यवहार नियम व अटी पाळून सुरू करण्यात आल्याने आज बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली. हॉटेल, चहाची दुकाने, बियाणे बाजारपेठ आदी ठिकाणी गर्दीचे प्रमाण हे अधिक होते. घराबाहेर पडताना आज अनेकांनी मास्क घातल्याचे दिसून आले. क्वचित ठिकाणी काही तुरळक नागरिक विनामास्कचे दिसून आले. त्यांनाही पालिका तसेच पोलिसांचे पथक थांबवून मास्क घालण्यासाठी विनंती करताना दिसून आले.
पावसाने गर्दीवर फेरले पाणी
सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक करण्यात आल्याने सकाळपासूनच दुकाने उघडली होती. दोन महिन्यांनंतर दुकाने उघडल्याने एक ते दीड तास साफसफाईतच केल्याचे दिसून आले. मुख्य बाजारपेठेत सकाळी १२ वाजेपर्यंत बऱ्यापैकी गर्दी होती. परंतु नंतर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाल्याने गर्दीवर त्याचा परिणाम झाला.