विजय मुंडे
जालना : कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. परंतु, पहिला डोस घेऊन मुदत संपली तरी जिल्ह्यातील १८ हजार ७६३ जणांनी अद्याप दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे.
नागरिकांनी वेळेत लस घ्यावी, म्हणून प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. परंतु, अनेकजण लस घेत नाहीत. विशेष म्हणजे पहिला डोस घेतलेल्या १८ हजार ७६३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही. यात कोविशिल्ड लस घेतलेले १६,५००, कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या २,२६३ जणांचा समावेश आहे.
नेमकी अडचण काय ?
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या मागील महिन्यापासून घटलेली आहे. त्यामुळे अनेकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाली आहे. लसीबाबत पसरलेल्या अनेक अफवांमुळेही नागरिकांनी लस घेण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.
दुसरा डोस घेणेही तितकेच आवश्यक
कोरोनाच्या लढ्यात आरोग्य विभागाने लसीकरणाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यानुसार लसीकरणाचे नियोजन केले जात आहे.
त्यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस सर्वांनी वेळेत घेणे आणि सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.
वेळेत लस घ्यावी
जिल्ह्यातील नागरिकांनी लस घ्यावी यासाठी जनजागृती करण्यासह शिबिरांचे नियोजन केले जात आहे. शासनस्तरावरून मागणीनुसार लस उपलब्ध हाेत आहे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांनी मुदतीत दुसरा डोस घ्यावा.
- डॉ. जयश्री भुसारे