ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. १७ - ऑस्ट्रेलियातल्या हजारो भारतीयांच्या मोदी मोदी अशा आरोळ्यांमध्ये आपल्या आक्रमक शैलीतल्या भाषणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विदेशी भारतीयांवर असलेली जादू पुन्हा एकदा दाखवली. सिडनीमध्ये मला मोह आवरत नाही असं सांगत, मोदींचं ट्रेडमार्क बनलेल्या दोनो मुठ्ठी बंद करके भारत माता की जयचा उद्घोष मोदींनी भारतीयांकडून करून घेतला. आपण नुसती आश्वासनं देत नाही तर ती तडीस नेतो असं सांगमा-या नरेंद्र मोदींनी अमेरिकेत जाहीर केलेले निर्णय पूर्ण होत असल्याचे सांगितले. पर्सन ऑफ इंडियन ओरिजन म्हणजे पीआयओ हे कार्ड असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांना आजीवन व्हिसा देण्याचा निर्णय पूर्णत्वास नेत असल्याचे ते म्हणाले. तसेच ओसीआय म्हणजे ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया आणि पीआयओ हे दोन्ही प्रकार एकत्र करण्याचे काम ९ जानेवारीपूर्वी करणार असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियान प्रवाशांसाठी व्हिसा ऑन अरायव्हलची घोषणा नरेंद्र मोदींनी केली असून आपले सरकार लोकांच्या मध्ये अडथळा बनणार नाही आणि त्यांना सन्मानपूर्वक जगण्यासाठी मदत करेल असे सांगितले. विदेशी भारतीयांना घ्याव्या लागणा-या पोलीसांच्या चौकशीपासूनही मुक्तता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी काय म्हणाले मोदी:
- देशातील छोट्या लोकांसाठी छोटी छोटी काम करुन त्यांना मोठे करणे हेच माझे ध्येय
- आधीच्या सरकारना कायदे बनवायला मजा यायची मला कायदे संपवायवला आनंद होतो - नरेंद्र मोदी
- सरकार देश बनवत नाही, तर जनता देश बनवते. सरकारचं काम लोकांच्या मध्ये न येण्याचं आहे. सरकार लोकांच्या कामात अडथळा बनले नाहीत तर लोकांच्या भरवशावर देश पुढे जाईल.
- आता जग शक्तीने नव्हे तर बुद्धीने चालणार आहे, यासाठी सामर्थ्यवान नागरिकांना तयार करुन जगाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारताला सज्ज करायला हवे
- केवळ तंत्रज्ञानाद्वारे जीवन जगता येणार नाही, त्यासाठी मनुष्यबळाची नितांत गरज, ही गरज पूर्ण करण्याची क्षमता भारतामध्येच आहे
- भारतात मनुष्यबळ विकासाची गरज आहे
- प्रवाशांची संख्या वाढतेय, पण रेल्वेची संख्या वाढत नाही, रेल्वेच्या विकासासाठीच आम्ही रेल्वेमध्ये १०० परकीय गुंतवणुकीस मंजुरी दिली
- जगभरातील उद्योजकांनी भारतात येऊन उत्पादन करायला हवे, पण यासाठी उद्योजकांना चांगल्या सोयीसुविधा देण्याची गरज
- भारतात स्वच्छता वाढल्यास पर्यटनात वाढ होईल
- कचरा उचलणा-याला आपण कचरेवाला म्हणतो, पण प्रत्यक्षात तो साफसफाई करतो, आपल्याला हीच मानसिकता बदलायची आहे
- परिश्रमाचे सन्मान करणे हे मी ऑस्ट्रेलियातून शिकलो
- शौचालय नसणे ही देशासाठी लाजीरवाणी बाब, ऑस्ट्रेलियातील भारतीयांनी त्यांच्या मूळगावी शौचालय बांधण्यासाठी मदत करावी
- देशाच्या पंतप्रधानांना शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घ्यावे लागले
- जन धन योजनेमुळे बँकेमध्ये तब्बल ५ हजार कोटी रुपये जमा झाले
- व्यवस्था तीच, कार्यालयही तेच, आता फक्त कामाची पद्धत बदलली
- अवघ्या ९० दिवसांमध्येच आम्ही लाखो लोकांना बँक खाती उघडून दिली
- जन धन योजनेंतर्गत आम्ही गरिबांना बँक खाती उघडून देण्याचा निर्धार केला आहे
- मला छोटी छोटी काम छोट्या लोकांना मोठ करण्यासाठी करायची आहेत
- भारतीय जगात जिथे असतील तिथे त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन काम करावे
- भारतीय वंशाच्या लोकांनी विविध क्षेत्रांमध्ये ऑस्ट्रेलियाचा झेंडा रोवला, हीच आपली ताकद
- १९६४ च्या ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व एका भारतीय वंशाच्या खेळाडूने केले होते
- ऑस्ट्रेलियातील नागरिकांना भारतीय आपलेसे वाटतात
- भारताकडे अफाट उर्जा
- भारतमातेकडे अडीचशे कोटी हात असून यातील निम्म्याहून अधिक हात हे तरुण आहेत
- लोकशाही हा दोन्ही देशांना जोडणारा महत्त्वाचा दुवा
- ऑस्ट्रेलिया आणि भारतात क्रिकेटशिवाय जगता येत नाही, या दोन्ही देशांना क्रिकेटने जोडले, पण ऐतिहासिक घटना व सांस्कृतिक परंपरेनेही दोन्ही देशांना जोडले आहे
- सध्या अवघ्या काही तासांमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचता येते, पण भारताच्या पंतप्रधानांना इथे येण्यासाठी २८ वर्ष लागली
- देशासाठी जगण्याचा निर्धार करा, हाच भाव भारताच्या सव्वाशे कोटी जनतेच्या मनातही निर्माण झाला आहे
- आम्हाला भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची संधी मिळाली नाही, पण देशासाठी जगू तर शकतो