ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २५ - नरेंद्र मोदींनी शपथविधी सोहळ्याला पाकिस्तान, श्रीलंकेसह सार्कमधील सर्व राष्ट्रप्रमुखांना निमंत्रीत केल्याने भारत व शेजारी राष्ट्रांमध्ये मैत्रीचा कमळ बहरु लागल्याचे दिसत आहे. श्रीलंका व पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या भारतीय मच्छिमारांची सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे पाकने याची सुरुवात म्हणून रविवारी ५९ भारतीय मच्छिमारांना सोडून दिले आहे.
भारतातील मच्छिमार समुद्रात मासेमारी करत असताना भारताची हद्द ओलांडून पाकिस्तान किंवा श्रीलंकेच्या सागरीहद्दीत पोहोचतात. यामुळे पाकिस्तान व श्रीलंकेच्या नौदलाचे जवान या मच्छिमारांना अटक करतात. भारतातील असे शेकडो मच्छिमार पाकिस्तान व श्रीलंकेच्या तुरुंगात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षा भोगत आहे.
मोदींनी पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून पाक, श्रीलंकेशी मैत्रीचा हात पुढे केला आहे. या सोहळ्यापूर्वीच याचे सकारात्मक परिणाम दिसत आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यापूर्वी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या ताब्यातील सर्व भारतीय मच्छिमारांना सोडून द्यावे असे आदेश श्रीलंकेच्या नौसेनेला दिले आहेत. तर पाकिस्ताननेही नवाझ शरीफ यांच्या भारतभेटीपूर्वी पाकमधील ५३ मच्छिमारांना सोडून दिले आहे.