वॉशिंग्टन : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार्या नव्या भाजपा सरकारकडून भारत-अमेरिका संबंध व्यवस्थित केले जावे, असे मत अमेरिकन भारतीयांनी व्यक्त केले. भारतीय-अमेरिकी उद्योजक एम.आर. रंगास्वामी म्हणाले की, आता प्रत्यक्ष कार्य करण्याची वेळ आहे. दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी १०० दिवसांच्या सक्रिय प्रयत्नांची आवश्यकता आहे. सिलिकन व्हॅलीचे उद्योजग रंगास्वामी इंडियास्पोराचे संस्थापक आहेत. ते म्हणाले की, नवीन पंतप्रधान आल्यामुळे मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे एकत्रित येऊन काम करायला पाहिजे. विश्वास दृढ करून संबंध पुढे न्यायला हवे. रंगास्वामी उदाहरणादाखल म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतासमवेत संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सुधारणेला पुढे नेऊ शकतात. भारतालासुद्धा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळू शकते. मोदी सरकार अमेरिकन नागरिकांना व्हिसा आॅन अरायव्हल सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. (वृत्तसंस्था) उद्योजक गुरराज देशपांडे म्हणाले की, लोकशाही पुढे नेण्यासाठी भारत-अमेरिका संबंध अत्यंत दृढ होणे गरजेचे आहे. दोन्ही देशांतील आर्थिक वृद्धीकरिताही मजबूत संबंधाची आवश्यकता आहे. आतापर्यंत अमेरिका आणि मोदींचे संबंध वादग्रस्त राहिले आहेत. अमेरिकेकडून व्हिसासाठी अडचणी येत होत्या. ते म्हणाले की, आता नरेंद्र मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे. भारत आता विकसनशील धोरणासह प्रगती करेल. मोदी एक मजबूत नेते म्हणून उदयास आले आहेत. देशाचा विकास करण्यास ते सक्षम आहेत. देशपांडे म्हणाले की, भारताला आर्थिक वृद्धीदर पुन्हा एकदा ७ ते १० टक्क्यांवर पोहोचवावा लागेल. (वृत्तसंस्था)
‘भारत-अमेरिका संबंध नव्याने आखले जावे’
By admin | Updated: May 24, 2014 04:22 IST