ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २ - भारताचा शेजारी असलेला पाकिस्तान वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंगन करून आगळीक करत असतानाच आता पाकिस्तानी नेतेही बरळू लागले आहेत. ' नरेंद्र मोदींना अटक करून पाकिस्तानात आणणा-याला मी १०० कोटींचे बक्षीस देईन' अशी मुक्ताफळं जमात -ए-इस्लामी संघटनेचा प्रमुख आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ सभागृहाचा खासदार सिराज उल हकने उधळली आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट येथील एका कार्यक्रमात आपल्या समर्थकांना संबोधित करताना त्याने हे वक्तव्य केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्याच देशातून विरोध सुरू झाला आहे.
'हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख व जिहादी नेता सय्यद सलाहुद्दीनवर बक्षीस जाहीर केल्यावरही भारताला त्याला अटक करण्यात यश मिळाले नसल्याचे त्याने यावेळी सांगितले. 'मी मोदींना सांगू इच्छितो की तुम्ही सलाउद्दीनला कधीच अटक करू शकणार नाही. तुम्ही म्हणता सलाउद्दीनला पकडणा-याला ५० कोटींचे बक्षीस देऊ. तर जो कोणी मोदींना पकडून (पाकिस्तानात) आणेल त्याला मी १०० कोटींचा इनाम देईन' असे त्याने म्हटले.
हक याने काश्मीरबाबतही वक्तव्य केले आहे. ' भारत सरकार काश्मीरच्या स्वातंत्र्यातील सर्वात मोठी अडचण असून, भारत व पाकिस्तान कधीही मित्र बनू शकत नाहीत आणि जे अशा मैत्रीची चर्चा करतात त्यांनी सरळ भारतात निघून जावे, असेही सिराज म्हणाला.