लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांचे तीन दिवसांपासून जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन सुरू आहे. मग्रारोहयोत काम सुरू करा आणि पूर्वी काम न मिळाल्याने बेरोजगारी भत्ता द्या अशी त्यांची मागणी आहे. या उपोषणस्थळी अधिकारी भेटी देऊन जात आहेत. मात्र उपोषण सोडविण्याचा मार्ग निघत नसल्याचे चित्र आहे.धानोरा येथील मजुरांनी मागील काही महिन्यांपासून अनेकदा कामांची मागणी केली. त्यात जानेवारी महिन्यात त्यांना एकदा कामही उपलब्ध झाले होते. मात्र तत्पूर्वी व नंतर काम मिळाले नाही. तर शासनाच्या योजनेनुसार सलग १00 दिवस काम उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली आहे. तरीही काम न मिळाल्याने बेरोजगारी भत्त्याची मागणी या मजुरांनी केली असून धरणे देण्यास महिलांचीही संख्या लक्षणीय आहे.याबाब रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांना विचारले असता ते म्हणाले, ७ जानेवारीच्या दरम्यान धानोरा गावात तीन मस्टर निघालेले आहेत. अधिकारी नसल्याने डीएसीअभावी मजुरी अदा करण्यात अडचण होती. आता ती दूर झाल्याने मजुरी खात्यावर जमा होईल. तर त्यांनी कामाची मागणी बीडीओकडे केली असल्याने त्यांच्या स्तरावरच याचा निर्णय होईल. बीडीओंनी कामे सुरू करण्यास ग्रा.पं.ला कळविले होते, असे सांगितले.
मजुरांचे धरणे आंदोलन अजूनही दुर्लक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:08 IST