हिंगोली : तालुक्यातील नवलगव्हाण परिसरातील साठवण तलावाचे काम तीन वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे तलावात मुबलक पाणीसाठा होत नसल्याने परिसरातील पाणीपातळी खालावली आहे. तसेच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
हिंगोली तालुक्यातील नवलगव्हाण परिसरामध्ये २०१७ मध्ये जलसंपदा विभागाच्या वतीने साठवण तलावाचे काम हाती घेण्यात आले. तलावात नवलगव्हाण, भांडेगाव, साटंबा आदी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, परिसरातील विहिरी, विंधन विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होईल, या अपेक्षेने परिसरातील शेतकरी आनंदित झाले होते. परंतु, तलावाचे काम हाती घेऊनही अद्याप तलावाचे काम पूर्ण झाले नाही. तलावाच्या पिंचींगचे काम, साईड रस्ता, कालवा आदी कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे यावर्षी पाऊस जास्त होऊनसुद्धा तलावात मुबलक पाणीसाठा झाला नाही. त्यात जानेवारीपासूनच तलाव कोरडा पडण्यास सुरुवात होते. आता तलावात पाण्याचे डबके साचल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात अभियंता वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता, तलावाचे काम करणाऱ्या गुतेदाराला तलावाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात महिन्यापूर्वी पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लाखो रुपये खर्चूनही शेतकऱ्यांना अद्याप म्हणावा तसा तलावाचा फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याचे दिसून येत आहे.
४९० हेक्टर सिंचन क्षमता...
नवलगव्हाण येथे उभारण्यात येणाऱ्या सिंचन तलावाची माथा पातळी ४७४.२०० मीटर असून महत्तम पातळी ४७२.७०० मीटर आहे. तसेच पाणी संचय पातळी ४७१.५०० मीटर असलेल्या या तलावातील पाणीसाठवण क्षमता २.७३२ दलघमी आहे. या तलावात पाणीसाठा झाल्यास परिसरातील ४९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणीच उपलब्ध झाले नाही.