बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय करावी
हिंगोली: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. एस. टी. महामंडळाच्या आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
वीजपुरवठा खंडित : शेतकरी त्रस्त
कळमनुरी: तालुक्यातील ग्रामीण भागात १५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विहिरींना सद्य:स्थितीत भरपूर प्रमाणात पाणी असतानाही वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.
वळण रस्ते बनले खड्डेमय
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील वळण रस्ते मागील काही दिवसांपासून खड्डेमय बनले आहेत. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. वेळोवेळी संंबंधित विभागाला सांगण्यात आले, परंतु, अद्यापतरी कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. संबंधित विभागाने वळण रस्त्यावरील खड्डे डांबरमिश्रीत गिट्टी टाकून बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
शिरडशहापूर येथे दिवसाही पथदिवे सुरु
शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील बाजारगल्ली, रजा मोहल्ला, मारोती मंदिर आदी परिसरात दिवे सुरू आहेत.
याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतला कळविले. परंतु, कोणीही अद्यापतरी लक्ष दिले नाही. ग्रामपंचायतच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन दिवसा सुरू असलेले पथदिवे बंद करावेत, अशी मागणी होत आहे.
वानरांचा बंदोबस्त करा ; नागरिकांची मागणी
हिंगोली: शहरातील कापडगल्ली, शास्त्रीनगर, गंगानगर, शिवाजीनगर, जिजामातानगर, तोफखाना आदी भागात वानरे छतावरून उड्या मारत आहेत. अंगणात ठेवलेल्या वस्तूंची नासाडी करीत करीत आहेत. वानरांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येत आहेत. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.