नर्सी येथील शेतकरी राजू निवृत्ती नागरे यांचे नर्सी ते सेनगाव रोडला लागूनच पहेणी पाटीजवळ शेती आहे. शेतामध्ये त्यांनी दोन खोल्या बांधलेल्या आहेत.
या खोल्यामध्ये त्यांनी सोयाबीन, हरभऱ्याचे कट्टे भरून ठेवले होते.
१४ एप्रिलच्या रात्री शेतातील आखाड्यावर कोणीच नव्हते. शेतकरी राहत नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी खोलीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खोलीमध्ये ठेवलेले ६० हजार रूपये किमतीचे हरभऱ्याचे २० कट्टे चोरून नेले. तर उर्वरित १० कट्ट्यावर कापड व तुऱ्हाट्या टाकून जाळून टाकले. यामध्ये शेतकऱ्याचे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले. आगीमुळे इतरही साहित्य जळाल्याने नुकसान झाले आहे
शेतकऱ्यांनी दुसऱ्या खोलीमध्ये सोयाबीनची पोती भरून ठेवली होती. चोरट्यांनी या खोलीचेही कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना आत प्रवेश करता आला नाही.
याप्रकरणी राजू नागरे यांच्या फिर्यादीवरून नर्सी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास जाधव करीत आहेत.
दरम्यान, नर्सी परिसरात काही दिवसांपासून चोरटे सक्रीय झाले आहेत. चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र चोरट्यांचा शोध लागत नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.