हिंगोली : जिल्हा पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. मोठ्या गुन्ह्याची उकलही तेवढ्याच तत्परतेने केली आहे. मात्र भुरट्या चोरांनी पोलिसांचे काम वाढविले आहे. मागील एक ते दीड महिन्यात चोरट्यांनी दहा दुचाकी लांबविल्या असून तेवढ्याच घरफोड्या केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे टाकले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वच बाजूंनी तपास करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना यशही आल्याचे दिसत आहे. हिंगोली शहरालगत असलेल्या सुराणा नगरातील दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांचा छडा लावून त्यांना जेलची हवा दाखविली आहे. त्यानंतर बासंबा पोलीस ठाणे हद्दीत एका महिला कर्मचाऱ्याला दिवसा लुटणाऱ्या लुटारूंना काही तासातच पकडण्याची किमयाही पोलिसांनी केली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी सेनगाव तालुक्यातील वृद्ध महिलांचा खून करणाऱ्या सिरियल किलरलाही बेड्या ठोकण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. एकीकडे कौतुकास्पद कामगिरी केली जात असताना दुसरीकडे भुरट्या चोरांनी पोलिसांचे काम वाढविले आहे. मागील एक ते दीड महिन्यात जिल्ह्यात तब्बल दहा घरफोड्या झाल्या आहेत. यातून हजारोंचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. यातील एक ते दोन गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर मात्र इतर चोरीच्या घटनेतील आरोपी अद्याप हाती लागले नसल्याचे चित्र आहे. अधून-मधून चोरीच्या घटना घडतच आहेत. घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.
दुचाकी चोरटेही सक्रिय
जिल्ह्यात मोबाइल, दुचाकी चोरटेही सक्रिय झाले आहेत. त्यामुळे दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटनाही घडत आहेत. मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार केली असता मोबाइल हरवला असल्याची नोंद घेतली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अनेकजण मोबाइल चोरीला जाऊनही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र दुचाकी चोरीला गेल्याची नोंद घेतली जात आहे. मागील एक ते दीड महिन्यात तब्बल दहा दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यामुळे दुचाकी चोरटे सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे दुचाकीचालक वाहन उभी करताना विशेष काळजी घेत आहेत.