सेनगाव : मानवी जीवनात विद्यार्थी अवस्था ही पूर्वांग आहे. ही अवस्था चांगली आणि कर्तव्यदक्ष रितीने पार पाडली तरच आयुष्याच्या उत्तरंगात सुख, समाधान आणि आनंद प्राप्त होतो. विद्यार्थी अवस्था खऱ्या अर्थाने जीवनाचा पाया असल्याने हा पाया अधिक भक्कम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प. पू. मुनिश्री १०८ अक्षयसागर महाराज यांनी केले.
महाविर दिगंबर जैन मंदिर शिलान्यास दोन दिवसीय कार्यक्रमासाठी २७ जानेवारी रोजी प. पू. अक्षयसागर महाराज आले असता, भाविकांच्या प्रवचन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी जीवन आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी मुनिश्री अक्षयसागर म्हणाले, प्रत्येक मनुष्याची ओळख ही त्याचातील गुणांद्वारे केली जाते. विद्यार्थांकडे जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे. गुरूविषयी निष्ठा असावी, जिज्ञासा, आत्मविश्वास व दृढ संकल्प या तीन गोष्टी विद्यार्थ्यांना यशस्वी करतात. शिक्षण आमचे साध्य नाही ते साधन आहे. ज्या शिक्षणामुळे आम्ही चारित्र्यवान बनू शकतो. तेच खरे शिक्षण आहे. मातृभाषेत शिक्षणाची आवश्यकता आहे. भाषा शिकविण्यासाठी आपल्या मुलांचे बालपण हरवून घेणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. तसेच आधुनिक समृद्ध आणि शक्तीशाली राष्ट्राच्या उभाणीत मातृभाषेची कोणती भूमिका असू शकते, यांची जाणीव आज नसल्याचे दिसून येते. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षांनंतरसुध्दा आमची शिक्षणपद्धती, नोकरशाही, राजकारण, प्रसिद्धी, माध्यमे, न्यायालये आणि संसदेतही इंंग्रजीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे देशाचे प्रंचड नुकसान झाले असल्याचे मत व्यक्त केले. याबद्दल गांभीर्याने चिंतन होऊन आवश्यक ते बदल होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो नं. १९