शुक्रवारी झूम ॲपद्वारे गायकवाड यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार उपस्थित होते.
यावेळी गायकवाड यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन जास्त दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. याकरिता या औषधाच्या प्राप्त, वापर व शिल्लक साठ्याबाबतची माहिती घेत प्रशासनाने नियंत्रण ठेवावे. जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण करण्यात येत असून, ग्रामीण भागातून यास अल्प प्रतिसाद मिळत आहे. याकरिता जनजागृती करून जनतेला लसीकरण करून घेण्याबाबत प्रोत्साहित करावे, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी जिल्ह्यात मागील पूर्ण वर्षभरात ४ हजार पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते; परंतु टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. त्यामुळे दि.१ फेब्रुवारी ते ८ एप्रिल २०२१ पर्यंतच्या कालावधीत ४ हजार २४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती दिली. रुग्णामंध्ये वाढ होण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे, तसेच या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाटा उपलब्ध आहेत. कोविडची सर्व केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, तसेच खाजगी दोन डीसीएचसी व दोन सीसीसी सेंटर सुरू करण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा साठा मुबलक आहे. आयसीयूमध्ये दाखल रुग्णांनाच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करायचा असताना इतर रुग्णांनाही रेमडेसिवीरचे इंजेक्शन देत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या असून, रेमडेसिवीर इंजेक्शनचा विनाकारण वापर केल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे सांगितले .
आरटीपीसीआरची नवीन मशिन
रुग्णांच्या तपासणीसाठी नवीन आरटीपीसीआर मशीन मागविली आहे. ही मशीन उपलब्ध झाल्यावर आरटीपीसीआरच्या टेस्ट वाढणार आहेत. जिल्ह्यातील वसमत व कमळनुरीमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त आहे. जी गावे जास्त प्रभावित आहेत ती गावे कंटेन्मेंट झोन घोषित केल्याचे जयवंशी यांनी सांगितले.