वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील वंजारवाडा भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीजपुरवठा नेहमी या-ना-त्या कारणाने खंडित केला जात आहे.त्यामुळे महावितरणच्या कारभाराला या भागातील नागरिक वैतागले आहेत. वरिष्ठांनी दखल घेत या भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रस्ता दुरूस्तीची मागणी
संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावानजीक असणाऱ्या एमआयडीसी भागातील रस्ते खराब झाले आहेत. या भागातील रस्त्यावरुन नेहमी जडवाहनांची वर्दळ सुरू असते. यामुळे या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. खड्डेमय बनलेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
नाल्यातील पाणी तुंबले
घोटा देवी : हिंगोली तालुक्यातील घोटा देवी गावातील नाल्यात कचरा साचला आहे.यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. नाल्या तुंबल्यामुळे यातील घाण पाणी रस्त्यावर येत आहे. रस्त्यावर घाण पाणी जमा होत पादचारी तसेच वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. तेव्हा गावातील नाल्या साफ करण्यात याव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
विवेकानंद भागातील रस्ता उखडला
हिंगोली : शहरातील विवेकानंदनगर ते अकोला बायपासकडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्यावरुन दुचाकीसह इतर वाहनधारकांना आपले वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. याचबरोबर रस्त्यावरील गिट्टीही उघडी पडल्यामुळे याठिकाणी धूळीचे वातावरण राहत आहे.
बससेवा सुरू करण्याची मागणी
पांगरा शिंदे : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावासह परिसरातील गावात धावणारी बससेवा कोरोनाच्या महामारीमुळे बंद करण्यात आली आहे. सध्या अनेक ग्रामीण भागातील बससेवा सुरू करण्यात आली असून पांगरा शिंदे, बोल्डा, वाई व इतर गावांसाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी या भागातील गावकऱ्यांतून होत आहे.