एसटी आगाराचे उत्पन्न वाढावे, तसेच ५ ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील बस सुरू करण्यात येणार आहेत. येथील एसटी आगारातून ग्रामीण भागात १० गावांना मुक्कामी बस सोडल्या जातात, तसेच जांब व वाकोडी या दोन मुक्कामी बस सध्या सोडल्या जाणार नाहीत, येत्या दोन ते तीन दिवसांत या दोन्ही बस सोडल्या जाणार असल्याचेही स्थानकप्रमुखांनी सांगितले.
पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील सर्व बस सुरू करण्याच्या सूचना एसटीच्या महाव्यवस्थापकांनी सर्व आगारप्रमुखांना दिलेल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील सर्व बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे एसटी आगाराचे उत्पन्न वाढणार आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील बस बंद असल्यामुळे अवैध वाहतुकीची पाळेमुळे खोलवर रुजली होती. आता मात्र ग्रामीण भागातील बस सुरू होणार असल्याने काही प्रमाणात अवैध वाहतुकीला आळा बसणार आहे. ग्रामीण भागातील सर्व बस सोडण्यात येणार असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी येण्याकरिता सोयीचे जाणार आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची शाळेत येण्या- जाण्याची सोय होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील शाळेत जाऊन त्यांना एसटी बसच्या पास देण्याच्या सूचनाही एसटीच्या महाव्यवस्थापकांनी आगारप्रमुखांना दिलेल्या आहेत. त्यानुसार शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना बसच्या पासचे वाटप करण्यात येणार आहे.