जिल्हाभरात खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पावसाने झोडपल्याने बहुतांश सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. पाऊस जास्त झाल्याने सोयाबीनच्या झाडांना जास्त शेंगाच लागल्या नाहीत. तसेच सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याची ओरड काही भागातून झाली. मूग, उडीद या पिकानेही दगा दिल्याने शेतकऱ्यांची मदार सोयाबीनवर होती. मात्र सोयाबीनच्या पिकानेही दगा दिला. उत्पादनात घट झाल्याने भाव वाढतील अशी शक्यता शेतकऱ्यांना होती. मात्र, सुरूवातील सोयाबीनचे दर ३ हजार ५०० ते ३ हजार ९०० रूपये होते. दरात वाढ होईल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले नाही. परंतु, दीपावली सण लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले. बहुतांश शेतकऱ्यांनी ४ हजारांच्या आतच सोयाबीनची विक्री केली. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर आता बाजारपेठेत सोयाबीनचे दर वाढले आहेत. ५ फेब्रुवारी रोजी सोयाबीनचे दर ४ हजार ४८० रूपयांवर होते. भाववाढीचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होत असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.
नवीन तूर ६ हजार १०० रूपयांवर
सोयाबीनसह तूर पिकानेही शेतकऱ्याने दगा दिला आहे. सध्या नवीन तुरीचा भाव ६ हजार १०० ते ६ हजार ५०० रूपयांपर्यंत आहे. तसेच हरभरा ४ हजार १०० ते ४ हजार ४०० रूपये प्रति क्विंटल दराने अनेक व्यापाऱ्यांनी खरेदी केला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.