गृहिणी म्हणून या अर्थसंकल्पाकडे पाहताना महागाई कमी होईल, असा कोणताच निर्णय यात दिसत नाही. तर कर प्रणालीतही काहीच बदल न झाल्याने सामान्यांच्या खिशाला बसणारी झळ कायम राहणार आहे.
सीमा मगर, गृहिणी
या अर्थसंकल्पात जीएसटीबद्दलच्या अटींबाबतही काही निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र तसे काहीच झाले नाही. तरीही कराचा नवा भुर्दंड नाही, याचे समाधान आहे. दळणवळणासाठी भरीव तरतूद दिसत आहे.
अभिजित निंघूरकर, किराणा व्यापारी
पेट्राेल व डिझेलवर अधिभाराचे संकेत शासनाने दिले आहेत. मात्र भाववाढ होणार नाही, असेही सांगितले. तूर्त यावर काही सांगणे अवघड आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्यावरच कळेल.
सुमित चौधरी, पेट्रोल पंपचालक
ट्रांसपोर्ट व्यवसाय आधीच मंदीत आहे. त्यात पेट्राेल, डिझेलचे दर वाढतच आहेत. आता नव्याने जुनी वाहने स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला तो चांगला असला तरीही त्यात एक वर्षापर्यंत नवीन गाडी खरेदीसाठी जीएसटीत माफी दिली पाहिजे. तर त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
जगजितराज खुराणा, वाहनमालक
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना करमाफी देण्याची व पेन्शनधारकांना आयकर परतावा भरावा लागणार नाही, हा केंद्राने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे नक्कीच ज्येष्ठ नागरिक व पेन्शनधारकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
-कुंडलिकराव निर्मले, ज्येष्ठ नागरिक, हिंगोली.
शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे. परंतु, हमीभावाची घोषणा केली तशी खरेदी केंद्र सुरू करून त्यात वाढ होणे अपेक्षित आहे. तसेच सिंचनक्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने तुषार, ठिबक खरेदीची सबसिडी वाढवून ८० टक्के करणे आवश्यक होते.
-डी.एम. माखणे, शेतकरी, साळवा
लेहमध्ये केंद्रीय विद्यापीठ तसेच १०० नव्या सैनिकी शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय युवकांसाठी वरदान ठरणार आहे. या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी युवकांना मिळणार आहे. तसेच वन नेशन वन रेशनकार्ड योजना लागू करण्याचा घेतलेला निर्णयही चांगला आहे.
-सुरेश पाईकराव, युवक, येलकी