हिंगाेली : जिल्ह्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली असली तरी अद्याप विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काही विद्यार्थी पाठीवर दप्तर घेऊन तयार आहेत. तर काहींना अजून सुट्टी हवी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहा महिण्यांपासून बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी ९ ते १२ वीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. मात्र कोरोनाच्या भीतीने अनेक पालक पाल्यांना शाळेत पाठविण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे सरासरी ३० टक्के पालकांनी अद्यापही संमतीपत्र दिले नाही. तर काही पालकांना पाल्याचे नुकसान होऊ नये असे वाटते. जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळांमधील बहुतांश विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी तयार होऊन बसले आहेत. तर आता शाळेत पाठविल्यास दोन महिण्यांसाठी शाळेची पूर्ण फिस भरावी लागणार असल्याची भीती खासगी तसेच इंग्रजी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आहे. त्यातच अनेक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास पूर्ण झाल्याने आता शाळेत जायचे कशाला? या विचारात अनेक विद्यार्थी आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी उत्सूक असले तरी काहींना अद्यापही सुट्टी हवी असल्याचे चित्र आहे.
विद्यार्थी काय देत आहेत कारणे?
- शाळा लांब असल्याने शाळेत जायचे कसे
- कोरोनाची भीती वाटत असल्याचे शाळेत जायचे टाळतो.
- ऑनलाईन अभ्यासक्रम बहुतांश पूर्ण झाला आहे.
- माझे मित्र शाळेत जात नाहीत. मग मी कशाला जाऊ.
- स्कूल व्हॅन चालकाने व्हॅन बंद ठेवल्याने शाळेत जाणार कसे
- पालकाने शाळेत जाण्यासाठी संमतीपत्रच दिले नाही.
- मध्यंतरात भूक लागली तर कुठे खाणार
-शाळेची फिस भरली नाही. तसेच शाळेचा गणवेशही घेतला नाही.
-गणित, विज्ञान, इंग्रजीच्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत.
- कोरोनाचे नियम पाळून शाळेत जाणारच आहे.
पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या
पाचवी -२१३४२
सहावी - २१०३४
सातवी - २०७४०
आठवी - २०५३५
वर्ग सुरू करण्याची तयारी
जिल्हा प्रशासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांनी कोरोना टेस्ट करून घेतली आहे. तसेच शाळा निर्जंतुकीकरण करण्यास सुरवात केली आहे. पालकांचे संमतीपत्रही घेतले जात असून पालकांशी संपर्क साधला जात आहे.
अनेक महिण्यानंतर शाळा सुरू होत आहे. काही दिवसांपासून खाजगी शिकवणी वर्ग लावले असले तरी शाळेत जाणारच आहे. इंग्रजी, विज्ञान, गणितातील अवघड संकल्पना समजून घेणार आहे
-वैभव भगवान राऊत , आठवीचा विद्यार्थी
शाळेपासून गाव दहा किलाेमीटर अंतरावर आहे. शाळेत जाण्यासाठी एसटी बसही नाही अन् स्कूल व्हॅनही बंद आहेत. तसेच शाळेने ऑनलाईन अभ्यास घेतला नसल्याने परीक्षेत पास होण्यासाठी मला शाळेत जायचे आहे.
- अंजली प्रमोद बलखंडे, पाचवीतील विद्यार्थीनी
शाळा सुरू होण्याची वाट पाहत असून शाळेत जाण्यासाठी पालकाची संमती मिळाली आहे. शाळेतील वर्ग मित्रांबरोबर अभ्यासाबाबत चर्चा करता येते. मात्र पूर्ण खबरदारी पाळून शाळेत जाणार आहे.
-सुमेध नागोराव इंगोले, सहावीतील विद्यार्थी
शाळेने ऑनलाईन शिक्षण सुरू केले होते. मात्र वडील शेतकरी असल्याने ॲड्राइड मोबाईल घेऊ शकले नाही. शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही ॲड्राइड मोबाईल अभावी अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. आता प्रत्यक्ष शाळेत जाऊन माझा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे.
- तनिष्का देविदास माखणे, सातवी तील विद्यार्थीनी