बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सिरसम येथील अंगणवाडी सेविका शारदाबाई विठ्ठल जाधव या मुलासोबत दुचाकीवर गावाकडे जात होत्या. त्यांची दुचाकी बासंबा पाटी परिसरात आली असता, दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांची दुचाकी अडवून जबरदस्तीने खाली ओढत नेले. त्यानंतर गळ्यातील सोन्याचे दोन हार, मोबाइल, नगदी रक्कम, बँकेचे पासबुक, असा ८६ हजार ३९९ रुपयांचा ऐवज लांबविला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तात्काळ रवाना केली. बासंबा सपोनि. राजेश मलपिल्लू, स्थागुशाचे उदय खंडेराय, हिंगोली ग्रामीणचे बी.आर. बंदखडके यांच्या पथकाने या परिसरात शोध घेऊन त्र्यंबक आनंदराव पवार, आत्माराम लोडबा कोठुळे, वसंता ऊर्फ बंडू रामराव घुगे या चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. यावेळी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरलेल्या मालासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा १ लाख १६ हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळणार बक्षीस
महिलेचे सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लांबविणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके नियुक्त केली होती. यामध्ये स्थागुशाचे उदय खंडेराय, सपोनि बी.आर. बंदखडके, सपोनि राजेश मलपिलू, पो.उप.नि. सुरेश भोसले, मगन पवार, पोना सतीश शेळके, प्रवीण राठोड, राहुल तडकसे, अश्रुजी काकडे आदींनी तपासात उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना बक्षीस देण्याची घोषणा कलासागर यांनी केली.