शासनाने ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेत जारी केलेल्या आदेशांपैकी अनेक बाबी जैसे थे ठेवल्या आहेत, तर काही नवीन बाबींना अत्यावश्यकमध्ये आणले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करणाऱ्यांना व ग्राहकांना मात्र सक्तीचे नियम केले. अन्यथा, दंडाची तरतूदही केली. जर नियम पाळले नाही तर संचारबंदी संपेपर्यंत दुकान न उघडण्याची कारवाई केली जाऊ शकते. वाहनचालक व घरकाम करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यास सूट दिली आहे, तर शासनाने घातलेले निर्बंध हे नागरिकांच्या वावर, हालचालींवर असून, वस्तू आणि मालावर नाहीत, असेही आदेशात म्हटले आहे.
हे सुरू राहणार...
रुग्णालये, रोगनिदान केंद्रे, क्लिनिक, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधी दुकाने, औषधी निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जसे की, रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि सार्वजनिक बस, स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात येणाऱ्या सार्वजनिक सेवा, वस्तूंची वाहतूक, कृषी संबंधित सेवा, ई-कॉमर्स, आरबीआय संलग्न सेवा, स्टाॅक एक्स्चेंज, अधिकृत मीडिया, पेट्राेल पंप, पेट्राेलियम पदार्थ, गॅस, डाक, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, फळविक्रेते. अत्यावश्यक सेवा असलेल्या दुकानांनी सामाजिक अंतर ठेवून, दुकानांसमोर अंतरासाठीच्या खुणा, ठरावीक अंतराने कोराेना चाचणी करून सकारात्मक अहवाल सोबत ठेवणे बंधनकारक आहे. उत्पादन क्षेत्रही विविध अटींचे पालन केल्यास सुरू ठेवता येणार आहे. त्यासाठीच्या वेगळ्या अटी निर्गमित केल्या आहेत. बांधकामासाठीही अटीच्या अधीन राहून परवानगी दिली.
काय बंद राहणार
अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व दुकाने, मॉल्स बंद राहतील. सिनेमा हॉल, नाट्यगृहे, प्रेक्षागृहे, सर्व धार्मिक स्थळे, केशकर्तनालय, स्पा, सलून, व्यायामशाळा, मनोरंजन पार्क, क्रीडासंकुले, जलतरण तलाव, ब्युटी पार्लर, शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. मात्र, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना यात सूट राहील. त्यांनी चाचणी निगेटिव्ह आल्याचा अहवाल सोबत ठेवणे आवश्यक राहील. धार्मिक उत्सव, यात्रा, राजकीय सभा, बैठका यांनाही बंदी आहे. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी नाही. लग्नसमारंभ २५ जणांत आटोपावा लागणार असून त्यासाठी परवानगी आवश्यक आहे. अंत्यविधीही २० जणांच्या उपस्थितीत उरकावा लागेल.
बस आसनक्षमतेप्रमाणे चालविता येणार
ऑटोरिक्षात चालक व इतर दोन प्रवासी तर टॅक्सीमध्ये चालक व आसनक्षमतेच्या ५० टक्केच प्रवासी नेता येणार आहेत. सार्वजनिक बसमध्येही आसनक्षमतेएवढेच प्रवासी नेता येतील. मास्क व इतर नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई होईल. खाजगी वाहने तसेच खाजगी बससेवा आपत्कालीन स्थितीतच वाहतूक करू शकेल. विनाकारण वाहतूक केल्यास दंड आकारला जाईल.
हॉटेल व रेस्टॉरंट
लॉजिंगच्या आतील आवारात असलेले रेस्टॉरंट आणि बार चालू राहतील व उर्वरित सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील. फक्त पार्सल सेवा घरपोच देता येईल. लॉजमधील सोडून इतरांना तेथेच जेवणाची सेवा देता येणार नाही. सार्वजनिक ठिकाणी लागणाऱ्या गाड्यांनाही पार्सल सेवाच देता येणार आहे.