हिंगोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना तरुण पिढीला टार्गेट करू पाहत आहे. तेव्हा तरुण पिढीने सहजरीत्या न घेता सामाजिक नियम पाळावेत, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नागरिकांना विनामास्क आणि विनाकारण बाजारात न फिरण्याचे आवाहन केले, तसेच कोरोनाचे नियम तंतोतंत पाळावेत, असेही सूचित केले आहे. ज्येष्ठ वगळता तरुण मंडळी कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, असेच आकडेवारीवरून दिसून येते.
१९ ते ३५ या वयोगटातील ६७८ तरुण मंडळी सद्य:स्थितीत कोरोनाबाधित असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट दिसून येत आहे, तर दुसरीकडे ५१ ते १०० या वयोगटातील ५५३ नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. तेव्हा नागरिकांनी कोरोना महामारीला सहजरीत्या घेऊ नये.
कोरोनाची दुसरी लाट २१ फेब्रुवारी रोजी सुरू झाली आहे. २१ फेब्रुवारी ते २६ मार्च यादरम्यान १९६८ रुग्ण नागरिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामध्ये तरुणांची संख्या माेठी आहे.
मृत्यूमध्ये वयस्क, गंभीर असलेले रुग्ण
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत वयस्क आणि गंभीर आजार असलेले रुग्ण हेच मृत्यूला कवटाळत आहेत. असे असतानाही वयस्क मंडळींनी घाबरून न जाता, औषधोपचार वेळेवर घेणे म्हणजे कोरोनावर मात केल्यासारखेच आहे. तेव्हा विनाकारण, विनामास्क वयस्कांनी बाहेर पडू नये. कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.
जिल्हा साथरोग तज्ज्ञांचे म्हणणे
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना तरुणांना मात्र याचे काहीच वाटत नाही. काही तरुण मास्कचा वापर फॅशन म्हणून करीत आहेत. कोरोना खेळणी नसून जीवघेणा आजार आहे. याचे भान तरुण मंडळींनी ठेवायला पाहिजे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालनही तरुण मंडळीकडून होणे आवश्यक आहे. ज्येष्ठांना कळले तसे तरुणांना कसे कळत नाही? खोकला, ताप, सर्दी, डोके दुखणे आदी प्रकार असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
- डॉ. इनायतुल्ला खान, जिल्हा परिषद, हिंगोली.