या सर्वांचा परिणाम म्हणून बाजारात गर्दी होत आहे. काही दुकानदारांनी तर ग्राहकांना आत प्रवेश देण्यासही प्रारंभ केला आहे. कुणीच कारवाई करीत नसल्याने व्यापाऱ्यांचे फावत असून अनेकजण कुठे काय मिळते, कसे मिळते, हेही सांगत आहेत. काहींनी यात लूटही चालविली आहे. जादा दाम मोजून ग्राहकांना या वस्तूंची खरेदी करण्याची वेळ आली आहे. आता नाईलाजाने ग्राहक या वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने चपला व बुटांच्या गरजवंतांना तर मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांनी दामदुप्पट किमतीत खरेदी केल्याचे दिसून येत आहे.
याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना विचारले असता ते म्हणाले, शासनाने निर्बंध घालून दिलेली दुकाने व्यापाऱ्यांनी उघडू नयेत. शासन निर्बंध उठेपर्यंत ही दुकाने उघडता येणार नाहीत. दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे. अन्यथा पालिका, पोलीस पथकाकडून कारवाई करण्यात येईल. तशा सूचना सर्व पालिकांसह स्थानिक संस्थांना देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.