बसस्थानकातील प्रवासी संख्या घटली
हिंगोली : शहरातील बसस्थानकामध्ये दोन दिवसांपासून प्रवासी संख्या घटल्याचे दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक नागरिकांनी बसद्वारे प्रवास करणे बंद केले आहे. बसस्थानकातील प्रवासी संख्या निम्म्यावर आली असल्याने हिंगोली आगाराच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झाली आहे.
पाणपोईची नागरिकांतून मागणी
कळमनुरी : मागील चार दिवसांपासून कळमनुरी शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे बाजारपेठेत व रस्त्यांनी पायी चालणाऱ्यांना तहान लागत आहे. शहरातील अनेक मुख्य ठिकाणी पाणपोई नसल्यामुळे नागरिक पाणी विकत घेऊन आपली तहान भागवित आहेत. पण सर्वसामान्यांना नेहमी विकतचे पाणी घेणे परवडत नाही. यामुळे पाणपोईची मागणी वाढली आहे.
वृक्ष संवर्धनाची गरज
वसमत : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक ठिकाणची पाणी पातळी खालवली जात आहे. यासाठी जमिनीची दिवसेंदिवस होणारी धूप वाचविण्यासाठी शहरात वृक्ष संवर्धनाची गरज असल्याचे सूज्ञ नागरिकांतून बोलले जात आहे.