हिंगोली: गेल्या तीन-चार महिन्यांपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना पर्यायी नोकरी करून कुटुंब चालविण्याची वेळ आली आहे. कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे.
मार्च, २०२० पासून कोरोना आजाराने थैमान घातले. त्यामुळे सात-आठ महिने बाहेर पडणे मुश्कील होऊन बसले होते. नाइलाजास्तव त्यावेळी घरीच बसावे लागले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्यापासून ऑटोरिक्षा बाहेर काढली आहे, पण प्रवासी मिळत नसल्यामुळे जागेवरच बसण्याची वेळ आजमितीस रिक्षाचालकांवर आली आहे. त्यात आता नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थोडीथोडी वाढ होत आहे, तेव्हा कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न रिक्षाचालकांपुढे ‘आ’ वासून उभा आहे. हिंगोली जिल्ह्यात पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षा २ हजार, डिझेलवर चालणाऱ्या रिक्षा ७०० आणि गॅसवर चालणाऱ्या रिक्षा या ६० जवळपास आहेत. सद्यस्थितीत सर्वच रिक्षाचालकांवर पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर वाढल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. १ डिसेंबर रोजी डिझेल ७८ रुपये ८६ पैसे तर पेट्रोल ९० रुपये ८ पैसे, १ जानेवारी रोजी डिझेल ८० रुपये ३४ पैसे, तर पेट्रोल ९१ रुपये ३१ पैसे आणि १ फेब्रुवारी रोजी डिझेल ८३ रुपये ३ पैसे, तर पेट्रोल ९३ रुपये ८५ पैसे असा दर राहिला होता.
दरवाढीचा व्यवसायावर परिणाम
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. पिंपरखेड येथील टेम्पोचालक नितीन सोनटक्के म्हणाले, ६२ रुपये लीटर डिझेल होते, तेव्हापासून व्यवसाय करतो. आजमितीस ८३ रुपये डिझेल झाले आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला टेम्पोतून आणतो. त्या पैशातून कुटुंब चालवतो, पण आज व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे. कधी-कधी परवडत नाही, म्हणून घरीच टेम्पो लावतो. डिझेलचे वाढलेले दर आता परवडेनासे झाले आहेत.
पैसे पुरत नसल्याने इतर कामे करतो
गेल्या काही वर्षांपासून मुलांना शाळेत ने-आण करण्याचे काम करतो, परंतु काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहन चालविणे अवघड होऊन बसले आहे. घर खर्चाला पैसे पुरत नसल्यामुळे मिळेल ते काम करून घर संसार चालवतो, अशी प्रतिक्रिया मुरली कल्याणकर यांनी दिली.
रिक्षाचालकांच्या प्रतिक्रिया
गत १७ वर्षांपासून रिक्षा चालवतो, पण अशी वेळ कधीही माझ्यावर आली नाही. पेट्रोलचे दर वाढल्याने रिक्षा चालविणे अवघड होऊन बसले आहे. घर चालवायला पैसा लागतो, म्हणून ‘नाइट वॉचमन’ म्हणून काम करावे लागत आहे. शासनाने गरिबांचा विचार करून पेट्रोलचे दर कमी करायला पाहिजेत, पण शासन विचारच करत नाही.
- दीपक गाजरे, रिक्षाचालक
पेट्रोल-डिझेल दर वाढल्यामुळे रिक्षा घरीच ठेवावी वाटत आहे, पण रिक्षा घरी ठेवली, तर घर कुटुंबाचा गाडा चालणे कठीण होऊन बसते. चार तास रिक्षा चालविल्यानंतर मिळेल ते काम करावे लागत आहे. शासनाने रिक्षाचालकांचा विचार करून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावे, एवढी शासनाकडे विनंती आहे.
- मनोज हातागळे, रिक्षाचालक
कोरोनाचे आठ महिने रिक्षा घरीच ठेवावी लागली होती. आता पेट्रोलचे दर वाढल्याने परत रिक्षा घरी ठेवण्याची वेळ आमच्यावर आली आहे. दिवसभर वाट पाहिल्यानंतर कुठे पाच-सहा प्रवासी मिळत आहेत. त्यावरच घरखर्च भागविला जातो. पेट्रोल स्वस्त होते, त्यावेळी एखादा लीटरजवळ बाळगत होतो. आता जेवढे पाहिजे, तेवढेच इंधन रिक्षामध्ये भरून घेत आहे. इंधन दरवाढीमुळे कंबरडेच मोडले आहे.
- विलास जगताप, रिक्षाचालक