हिंगोली : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असताना रुग्णसंख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनासह सर्वच चिंतेत असून पुन्हा लॉकडाऊन लागणार की काय, याची चिंता लागली आहे. परंतु, लॉकडाऊन परवडणारे नसून मास्क व सोशल डिस्टन्lिंग हाच पर्याय योग्य असल्याचे मत अनेक जण व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यात मागील महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहावयास मिळाले. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. कोरोना आटोक्यात येत आहे, असे वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकही बेफिकीर झाले. यातूनच बाजारपेठेत गर्दी होणे, शारीरिक अंतर न पाळणे, मास्क न वापण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोराेनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. गर्दी टाळण्यासाठी धरणे, सभा, आंदोलन आदींवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली, तर जिल्हा प्रशासन लॉकडाऊनचा पर्याय निवडणार का? हे जरी आता स्पष्ट नसले, तरी पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. यापूर्वी लॉकडाऊनमध्ये नागरिकांचे मोठे हाल झाले. आता कुठे सर्व जण यातून सावरत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन परवडणारे नसून कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावा, शारीरिक अंतर पाळावे, हात स्वच्छ धुणे हे पर्यायच योग्य असल्याचे मत अनेक व्यापारी, मजुरांनी व्यक्त केले आहे.
धोका वाढतोय
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण केले जात आहे. एकीकडे लसीकरणास प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी तब्बल १९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापूर्वी १९ फेब्रुवारी रोजी १६, १८ रोजी १३ रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असून यामध्ये शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे.
उद्योग संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात...
पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. यापूर्वी लागलेल्या लॉकडाऊनमुळे मोठे नुकसान झाले. आता कुठे व्यवसायाने उभारी घेतली आहे. नागरिकांनी शारीरिक अंतर पाळणे, हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क वापरणे हे सूत्र वापरल्यास लॉकडाऊनची गरज भासणार नाही.
-रमेश पंडित, उद्योजक
कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, गर्दी टाळावी, तोंडाला मास्क वापरावे. लाॅकडाऊनकाळात नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. आता पुन्हा लॉकडाऊन नको.
-अनिल नैणवानी, उद्योजक
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी यापूर्वी लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यात नागरिकांचे मोठे हाल झाले. शिवाय, सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नकोच. त्याऐवजी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नियमित मास्क वापरावा, गर्दीत जाणे टाळावे, हात स्वच्छ धुवावेत.
-ललीत खुराणा, उद्योजक
-
कोरोनाचे एकूण रुग्ण- ३८९१
बरे झालेले रुग्ण - ३७४०
कोरोना बळी - ५८