हिंगोली : येथील वीज वितरण कंपनीने वीजतंत्री व तारतंत्रीपदांसाठी घेण्यात आलेल्या भरतीत बाहेरील जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवारांची निवड केली आहे. इतर जिल्ह्यांत मात्र स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या भरतीमध्ये हिंगोली जिल्ह्यातीलच शिकाऊ उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे भाजपचे हिंगोली लोकसभा संघटक विनायकराव भिसे-पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यामार्फत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यासाठी वीजतंत्री व तारतंत्री या जागांच्या १०० शिकाऊ पदासाठी जाहिरात काढली होती. या भरतीमध्ये इतर जिल्ह्यांतील ७४ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. तर, केवळ २६ स्थानिक उमेदवारांना भरतीत प्राधान्य देण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील उमेदवार इतर जिल्ह्यांत भरतीसाठी गेले असता त्यांना नाकारत तेथील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शिकाऊ उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील उमेदवारांची भरती न करता स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा, ८ फेब्रुवारी रोजी कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्याचा इशाराही भिसे यांनी दिला आहे.