जाब विचारल्याने एकास तलवारीने मारहाण
हिंगोली : दुचाकी वाहनास कट का मारला, याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एकास तलवारीने मारहाण केल्याची घटना ३ एप्रिल रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास येथील पळशी रोडवरील आरामशीनसमोर घडली. या प्रकरणी भाऊराव आनंदराव कोरडे (रा.अंधारवाडी) यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मुलगा गणेश याच्या दुचाकीला का कट मारला, याचा जाब भाऊराव कोरडे विचारत होते. यावेळी त्यांना तलवारीने मारहाण करण्यात आली, तसेच मुलासही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भाऊराव कोरडे यांच्या फिर्यादीवरून संजय आत्माराम काळे, भारत आत्माराम काळे, आत्माराम काळे (सर्व रा. खंडाळा) यांच्या विरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेचा तपास सपोनि. बळीराम बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एस. वाठोरे करीत आहेत.