हिंगोली: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने खबरदारीसाठी जिल्हा प्रशासनाने २४ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यत रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असून, या संबंधीचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जारी केले आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्या अनुषंगानेच २४ फेब्रुवारीपासून रात्री सात ते सकाळी सात या दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत दूध विक्री केंद्र, दूध विक्रेेते यांना सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यत मुभा राहील. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, कार्यालये, बँका चालू राहतील. संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना ये-जा करण्यास मुभा राहील. परंतु, त्यांच्याकडे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. खाजगी रुग्णालयास संलग्न असलेली औषधी दुकाने रुग्णालयाच्या वेळेनुसार तसेच आपतकालीन परिस्थितीत आवश्यकतेनुसार दुकान चालू ठेवण्यास मुभा राहील. तसेच पत्रकार, त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांना वार्तांकन व कार्यालयीन कामकाजासाठी ये-जा करण्यास मुभा राहील. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य महामार्गाची कामे व दुरुस्ती करण्यास याचबरोबर आरोग्य, महावितरण, दूरसंचार, पाणीपुरवठा, स्वच्छता विषयक कामे करण्यास मुभा राहील. पेट्रोल पंप, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने, कृषी सेवा, कृषी संबंधित वाहनांना मुभा आहे. या कालावधीत यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या खाजगी अस्थापना, दुकाने, खानावळ, हॉटेल यांना परवानगी राहणार नाही. संचारबंदीच्या काळात विनामास्क आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मुभा देण्यात आलेल्या व्यक्तींनी मास्क, सामाजिक आंतर यासह शासन नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच लग्न समारंभासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी घेणे अनिवार्य असल्याचे आदेशात नमूद केले आहे.