हिंगोली : कोरोना महामारीचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागले आहेत. विवाह मुहूर्त जवळपास ३३ असून मंगल कार्यालयांना ५० वऱ्हाडी मंडळींसाठीच परवानगी दिली आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांना ‘सावध, सावधान घटिका’ पाळावी लागणार आहे.
गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. गतवर्षी ६५ ते ६७ विवाह मुहूर्त होते. परंतु, कोरोनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक विवाह घरच्या घरी आटोपून घ्यावे लागले. यावर्षी विवाह मुहूर्त ३३ असले तरी त्यासाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत. मंगल कार्यालयांनी ५० वऱ्हाडींनाच परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचे प्रमाण वाढल्याचे पाहून अनेक वधू-वरांच्या पित्यांनी विवाह मुहूर्त रद्द केल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रोज चार-पाच जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून कडक निर्बंध घातले आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगल कार्यालयातील नियम
मंगल कार्यालयांनी ५० व्यक्तींनाच परवानगी द्यावी. मंगल कार्यालयाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. लसीकरण न झाल्यास त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे, जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम बंधनकारक असतील, अशी माहिती निश्चल यंबल यांनी दिली.
असे आहेत विवाह मुहूर्त एप्रिल महिना : १७, २२, २४, २५, २६, २८, २९, ३०. (८ मुहूर्त). मे महिना : १, २, ३, ४, ५, ८, १३, १५, २०, २१, २२, २४, २६, २८, ३०, ३१ (१६ मुहूर्त). जून महिना : ४, ६, १३, १६, २०, २६, २७, २८ (८ मुहूर्त) असल्याची माहिती रेणुकादासगुरू कंधारकर यांनी दिली.