वीज खंडित होत असल्याने ग्राहक त्रस्त
हिंगोली: शहरातील आजम कॉलनी, नगर परिषद कॉलनी आदी नगरांमध्ये विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. वीज वारंवार खंडित होत असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे जळत आहेत. अनेकदा महावितरणच्या कर्मचाऱ्यांना याविषयी सांगण्यात आले. परंतु, कोणीही याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, अशी ग्राहकांची तक्रार आहे. महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.
वानरांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त
सवना : सेनगाव तालुक्यातील सवना, वायचाळ पिंपरी, ब्राह्मणवाडा आदी परिसरात काही दिवसांपासून वानरांनी उच्छाद मांडला आहे. घरावरील कौलांवरुन वानरे उड्या मारत आहेत. तसेच अंगणात ठेवलेल्या वस्तूंची नासाडी करत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वन विभागाने या वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी
कळमनुरी : शहरातील सातव महाविद्यालय ते महादेव मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. परंतु, काही वाहनचालक वाहने अस्ताव्यस्त उभी करत असल्याने अन्य वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना याचा त्रास होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करुन वाहतुकीची कोंडी सोडवणे गरजेचे आहे.
नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी
कळमनुरी : शहरातील गणेश नगर, साई नगर, रेणुका नगर, भोई गल्ली, भाजी मंडई, जुने बसस्थानक, नाईकवाडी, इंदिरा नगर, आठवडा बाजार, ब्राह्मण गल्ली आदी भागातील नाले अनेक दिवसांपासून साफ करण्यात आलेले नाहीत. यामुळे या नाल्यांतील पाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी पादचाऱ्यांना घाणीतूनच जावे लागत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने याची दखल घेऊन या भागातील नाले साफ करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.