कोरोना काळात रिक्षाचालकांचे बेहाल होत आहेत. याकरिता राज्य शासनाने रिक्षाचालकांना दीड हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य शासनाने दुजाभाव न करता जिल्ह्यातील सर्वच रिक्षाचालकांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, असा प्रश्नही परवानाधारक नसलेल्या रिक्षाचालकांनी केला आहे.
जिल्ह्यात ८१९ परवानाधारक रिक्षाचालक आहेत. शासनाच्या सूचनेप्रमाणे जाहीर केलेली मदत दिली जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी दिली.
प्रतिक्रिया
पोट भरण्यासाठी ऑटो घेतला; पण आज कोरोनामुळे तो चालविणेही कठीण झाले आहे. शासनाने जी काही मदत नोंदणीकृत रिक्षाचालकांसाठी जाहीर केली आहे, तशी मदत आम्हालाही दिल्यास आमचेही पोट भरेल.
- शेख रहीम शे. अजीज, रिक्षाचालक
गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालवून पोट भरतो. कोरोनामुळे तर प्रवासीही मिळेना झाले आहेत. दोन वर्षांपासून एकवेळ जेवण होत आहे. शासनाने परमिट रिक्षाचालकांसाठी मदत जाहीर केली आहे. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही मदत दिल्यास बरे होईल.
- शेख रहीम शेख करीम, रिक्षाचालक
दोन वर्षांपासून कोरोनाने जगणे मुश्कील करून सोडले आहे. प्रवासी मिळत नसल्यामुळे ऑटो घरीच लावावा लागत आहे. शासन परमिटधारक रिक्षाचालकांसाठी मदत देत असेल तर आम्हालाही मदत दिली पाहिजे. रिक्षा चालवूनच आम्हीही पोट भरतो. - एकबाल पठाण, रिक्षाचालक