याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले की, जोडणी करण्यापूर्वी नगरपालिकेकडे एक अर्ज देऊन नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर शहरातील प्रशिक्षित प्लंबरकडून लाभार्थ्यांनी स्वखर्चाने ही जोडणी करून घ्यायची आहे. यासाठीचे साहित्य व इतर बाबींवर त्यांनाच खर्च करावा लागणार आहे. शहरात २०११ च्या सर्वेक्षणानुसार साडेचौदा हजार मालमत्ताधारक आहेत. मात्र, आता त्यात वाढ होऊन हा आकडा २० हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे एवढ्या संख्येतील मालमत्तांचे काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्लंबर लागणार आहेत. या व्यवसायातील अनेकांना प्रशिक्षण दिले आहे. भविष्यातही गरज पडल्यास काहींना प्रशिक्षण देण्याची पालिकेची तयारी आहे.
कयाधूत जाणारी गटारगंगा थांबविणार
हिंगोली शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम होण्यापूर्वी नाल्यांचे पाणी थेट कयाधू नदीत जात असल्याने ती प्रदूषित होत होती. मात्र, आता भूमिगत गटार योजनेमार्फत पाणी मलनिस्सारण केंद्रात जाईल. तेथे शुद्धीकरण करून पुढे पाणी नदीत सोडण्याचा अथवा पुनर्वापराचा पर्याय स्वीकारला जाणार आहे. मात्र, कयाधूत मोठ्या नाल्यांतूनही सध्या जात असलेले पाणी बंद करण्यासाठी पालिकेने उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महादेव मंदिर परिसर, साठे पुतळा परिसर व स्मशानभूमीनजीक भूमिगत गटार योजनेच्या पाइपचा व्यास मोठा असल्याने या ठिकाणी नाल्याचे पाणी भूमिगत गटारच्या पाइपात सोडले जाईल. त्यामुळे कयाधू नदीत जाणारे घाण पाणी थांबणार असल्याचेही ते म्हणाले.