कळमनुरी तालुक्यातील येथील जयश्री दीपक मस्के हिला तिचा पती दीपक व जाऊ अर्चना हे दाेघे तिच्या लग्नानंतर काही दिवसांपासून त्रास देत होते. त्यातच ५ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी नऊ वाजता जयश्री हिचे अर्चनाशी पाण्याच्या कारणावरून भांडण झाले त्यानंतर काही वेळाने दीपक घरी आला. त्याने अर्चनासोबत मिळून जयश्रीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रागाच्या भरात दीपकने घरातील रॉकेलची कॅन आणून जयश्रीचा अंगावर ओतली. तर अर्चनाने आगपेटीची काडी लावून पेटवून दिले. यामध्ये जयश्री त्याच्या अंगावरील साडी पेटल्याने तिचे दोन्ही हात, चेहरा व इतर अंग भाजले. त्यानंतर जयश्रीचा भाया लक्ष्मण यांनी गावकऱ्यांच्या सहकाऱ्याने जयश्रीला पुढील उपचारासाठी नांदेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता जयश्री हिचा मृत्यू झाला. यावरून पती दीपक साहेबराव मस्के, जाऊ अर्चना लक्ष्मण मस्के या दोघांवर कळमनुरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. याबाबतचे दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाले. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांच्या न्यायालयासमोर चालले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून दीपक व अर्चना यांना कलम ३०२ भादंविनुसार दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. यामध्ये सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता एस.डी. कुटे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. एन. एस. मुटकुळे व ॲड. एस. एस. देशमुख यांनी सहकार्य केले.
विवाहितेस जाळून मारल्याप्रकरणी पती व जाऊला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST