खरीप हंगामामधून अतिवृष्टीच्या फटक्याने सोयाबीन, मूग, उडीद यासारखे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. परंतु रब्बी हंगामाच्या काळात तरी खरीप हंगामाची कसर निघावी यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, ऊस आदी पिकांची लागवड केली असून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची उगवणही झाली. परंतु वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रब्बी हंगामाच्या पिकांना पाणीपुरवठा केला जात नाही. मध्यरात्री वीजपुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना थंडी, साप, रानडुक्कर यांचा सामना करावा लागत आहे. एक आठवडा दिवसा तर एक आठवडा रात्री वीजपुरवठा केला जात आहे. दिवसा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. कोंडीतून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून पूर्णपणे वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
रब्बी हंगामाच्या काळात वारंवार वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST