सेनगाव : शहरातील गट नंबर ८८ मध्ये शेतकरी बालासाहेब आनंदराव देशमुख यांच्या शेतातील जवळपास पाच एकरातील कापून ठेवलेली तूर जळून खाक झाली आहे. या आगीत अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
येथील सेनगाव शिवारातील बालासाहेब देशमुख यांच्या दहा एकर शेतीमध्ये पाच एकर शेतातील तूर कापून शेतात पसरलेल्या अवस्थेत होती. गुरुवारी दुपारी या पिकाला अचानक वणवा लागून शेतातील सर्व तुरीचे पीक या आगीच्या भक्षस्थानी आले. शेतात सर्वत्र पसरलेल्या वणव्यात तुरीचे सर्व पीक जळून खाक झाले आहे. या आगीत अंदाजे दोन लाखांहून अधिक किमतीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी देशमुख यांनी सेनगाव तहसीलदार यांच्याकडे केली आहे.