हिंगोली : जिल्ह्यातील चार तालुके आणि हिंगोली शहरातील सर्वच कोरोना सेंटरवरील अग्निसुरक्षा ही व्यवस्थितरीत्या असून त्याची देखभालही रोजच्या रोज केली जाते, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
२६ मार्च रोजी भांडूप येथील ड्रीम्स माॅलमध्ये कोरोना उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या सनराइज रुग्णालयाला लागलेल्या आगीनंतर आता सर्वच ठिकाणी खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव आणि औंढा या तालुक्यात पूर्वीपासून अग्निसुरक्षा केलेली आहे. प्रत्येक केंद्रावर गोंधळ होऊ नये, म्हणून पोलीस, हाेमगार्डची नियुक्ती केली. तसेच प्रत्येक ठिकाणी खाजगी गार्डचीही व्यवस्था करण्यात आली. नित्यनेमाने साफसफाई केली जाते. भांडूप (मुंबई) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार पांडुरंग माचेवाड, मुख्याधिकारी डाॅ. अजय कुरवाडे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नामदेव कोरडे यांनी भेट देऊन सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतला आहे.
प्रतिक्रिया
जिल्ह्यातील चार तालुके आणि हिंगोली शहरातील सर्वच कोरोना सेंटरवर तपासणी करून सर्व सुरक्षा प्रारंभापासूनच केलेली आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने खाजगी गार्डही तैनात केले आहेत सर्व केंद्रांवर नित्यनेमाने साफसफाईही करण्यात येते. सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस केली जाते.
- डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक