हिंगोली : लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागल्याने हिंगोली शहरात दुपारपर्यंत सन्नाटा होता. ग्रामीण भागातून शहराकडे येणारा लोंढा आज दिसला नाही तर शहरातील नागरिकांचे डोळे टिव्हीकडे लागले होते. काहींनी निकाल ऐकण्यासाठी कामे थांबविल्याने शहरात दिसणारी गर्दी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर दिसून आली. परिणामी शहरातील दवाखाने ओस पडले होते, मार्केट थंड होते, बाजारात शुकशुकाट होता, रस्ते गर्दीविना सुने होते, बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकात बस प्रवाशांच्या वाट पाहत होत्या. पहिल्यांदाच हिंगोली शहर थांबल्याचे दिवसभर असलेले हे चित्र निकाल लागताच पालटून गेले. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर गर्दी केली होती. दुसरीकडे कामानिमित्त शहराकडे ग्रामीण भागातून येणारा लोंढा दिसला नाही. परिणामी शहरात प्रथम संचारबंदी लागल्यासारखी शांतता निर्माण झाली होती. अनेक व्यापार्यांनी दुपारपासून दुकाने उघडण्यास सुरूवात केली. सकाळी ग्राहकाविना बाजार भरला होता, नेहमी दवाखान्यात नेहमीची गर्दी नव्हती, लग्नसराई असूनही मार्केट थंड होते. परिणामी शहरातील सुनेसुने दिसणारे रस्ते निकाल जसजसा लागत गेला तसतसे फुलत गेले. प्रथमच शहरात विराण शांततेचे वातावरण पहावयास मिळाल्याचे अनेकांनी सांगितले. दवाखाने ओस कोणत्याही ऋतूत हमखास गर्दीने गजबजलेले असणारे दवाखाने शुक्रवारी ओस पडल्यासारखे दिसून आले. खासगी दवाखान्यांबरोबरच जिल्हा सामान्य रूग्णालयातदेखील डॉक्टरांना रूग्णांची वाट पहावी लागली. निकालासाठी उपचाराचा कालावधी लांबविल्याने पहिल्यांदाच दवाखाने गर्दीविना शांत होते. मार्केट थंड लग्नसराईचे दिवस असतानाही शुक्रवारी बाजारावर निवडणुक निकालाचा परिणाम जाणवला. लग्नामुळे नेहमी दिसणारी सराफा बाजार, कापड दुकानांवरची गर्दी दिसून आली नाही. उन्हाळ्यात प्रथमच दुकानांवरील व्यापारी आणि कामगारांना निकालाच्या योगाने विश्रांती मिळाली. दुपारपर्यंत बहुतांश निकाल हाती आले तरी बाजारात उलाढाल झाली नाही. भाजी बाजारात शुकशुकाट हिंगोलीत सकाळी पहिल्यांदा कामाला लागणारे भाजी बाजारातील विक्रेते नेहमीप्रमाणे पहाटपासून गाडे थाटून बसले होते; परंतु सकाळपासून हॉटेल्सचालक आणि नागरिकांनी पाठ फिरविल्याने बाजारात शुकशुकाट पसरला होता. सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणात होणारी खरेदी शुक्रवारी झाली नाही. परिणामी दिवसभर भाजीपाला विक्रेते हातावर हात धरून बसले होते. रस्तेही सुनेसुने कामानिमित्त ग्रामीण भागातून शहराकडे येणार्या लोकांनी शुक्रवारची कामे पुढे ढकलली होती. आजची कामे उद्यावर लोटल्याने ग्रामीण भागातून शहरात लोंढा आलाच नाही. परिणामी नेहमी रस्त्यावर दिसणारी खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनेही दिसून आली नाहीत. व्यापारी प्रतिष्ठाणांसमोर लागलेल्या वाहनांच्या रांगा दृष्टीस पडल्या नाहीत. परिणामी शहरातील रस्ते सुनेसुने झाले होते. ट्रॅफिक पोलिसांऐवजी बंदूकधारी जवान रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरातील रस्त्यावर निरनिराळ्या ठिकाणी उन्हातान्हात दिसणार्यां ट्रॅफीक पोलिसांऐवजी शुक्रवारी बंदुुकधारी जवान दिसून आले. महत्वाच्या ठिकाणी, चौकाचौकात, नाक्यानाक्यावर तसेच संवेदनशील ठिकाणांवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस पहारा देत होते. शहरात रात्रीच्यावेळी गस्त घालणारी पोलिसांची गाडी दिवसा पेट्रोलिंग करीत फिरत होती. बसेसना प्रवाशांची प्रतीक्षा लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रेल्वेस्थानक आणि बसस्थानक गजबजलेले राहते. दररोज प्रवाशी गाड्यांच्या प्रतीक्षेत थांबलेले असल्याचे चित्र शुक्रवारी उलटे होते. प्रवाशांअभावी रेल्वेगाड्या रिकाम्या जात होत्या तर बसेस प्रवाशांच्या प्रतिक्षेत दिसून आल्या. रामलीला मैदानावरही शांतता अवैध धंद्यांचे ठिकाण बनत असलेल्या रामलीला मैदानावर शुकशुकाट पहावयास मिळाला. वाहनांचा ताफा, हॉटेल्सवर दिसणारी गर्दी, विविध साहित्यांची खरेदी-विक्री पहावयास मिळाली नाही. दुकाने, हॉटेल्स तसेच इतर दुकाने बहुतांश जणांनी शुक्रवारी उघडलीच नव्हती. निकालानंतर फुटले फटाके निवडणुकीचा निकाल लागताच शहरात फटाके फुटण्यास सुरूवात झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली. तोपर्यंत निरव शांतता असलेल्या शहरातील मोकळ्या रस्त्यांवर वाहनांनी एकाएकी गर्दी केली. दिवसभर करफ्यूसारखी असलेली स्थिती निवळत जावून सायंकाळी रस्ते गर्दीने फुलण्यास सुरूवात झाली. त्याआधी नेहमी वर्दळ असलेले शहर पहिल्यांदाच थांबलेले पहावयास मिळाले. निकालाची उत्सुकता तीन जिल्ह्यास लागलेली होती. निकाल जाहीर करण्यात इतर जिल्ह्याच्या मानाने उशीर झाल्याने जिल्हावासियांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्याआधी नेहमीप्रमाणे सकाळी उघडणार्या बहुतांश दुकानांच्या शटरला कुलूप होते. लहानसहान हॉटेल्स, पानटपर्या तर दिवसभर बंद होत्या. निकाल लागण्यास उशीर झाल्याने ग्रामीण भागातून मिरवणुकीसाठी शहरात दाखल होणारे अनेकजण येवू शकले नाहीत. ग्रामीण भागात अनेकांनी आजची कामे उद्यावर लोटल्याने शहरात कामानिमित्त येणार्यांची संख्या घटली. परिणामी शहरातील दवाखाने, हॉटेल्स, कापड दुकानांवर गर्दी दिसून आली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुन्न असलेल्या शहरात अचानकच फटाके फुटण्यास सुरूवात झाली. जसजसे फटाके वाजत गेले तसतसे नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली. त्यानंतर गल्लीबोळात फटाक्यांचे आवाज घूमू लागल्याने शहर दणाणूून केले. अगदी सकाळपासून शांत असलेल्या शहरात एकाएकी घोळक्यांनी नागरिक चर्चा करताना दिसून आले. नाक्यानाक्यावर, चौकाचौकात, गल्लीबोळात निवडणुकीच्या निकालावर चर्चा रंगू लागल्या. तावातावाने मत मांडताना नागरिक महात्मा गांधी चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नवा मोंढा भागात दिसत होते. तोपर्यंत शहरातील रस्ते वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, बुलडाणा अर्बन बँकसमोर फटाके वाजून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. (प्रतिनिधी)
शहरवासियांचेही निकालाकडे डोळे
By admin | Updated: May 17, 2014 00:36 IST