हिंगोली : शहरालगत असलेल्या बळसोंड ग्रामपंचायत अंतर्गतच्या वसाहतीमध्ये कोणत्याही सुविधा नसल्यामुळे येत्या ग्रामपंचायत निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
पंधरा वर्षांपासून शहरालगत असलेली बळसाेंड वसाहत आहे. या अंतर्गत आनंद नगर, भारत नगर, चंद्रलोक नगर आदी वसाहतीत कोणतीही भौतिक सुविधा नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळा विनंती अर्ज करुनही सुविधेकडे लक्ष दिलेले नाही. सुविधा द्याव्यात म्हणून आंदोलन करुन ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदनही दिले आहे. परंतु अजूनही दखल घेतली नाही. तसेच शहरातील नवीन वसाहतीमध्ये पिण्याचे पाणी नाही, रस्ते नाहीत, नाली बांधकाम करण्यात आलेले नाही, विजेची समस्या कायम आहे. त्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेण्यात आला आहे.
यासंदर्भात २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर प्रल्हाद दराडे, वनमाला दराडे, वच्छला कांबळे, अंकिता कांबळे, शीतल कांबळे, जी. जी. सुतारे, वंदना भरणे, राजू कांबळे, रमा कांबळे, सीमा कांबळे, रामचंद्र ठाकरे, संजय ठाकरे, जिजाबाई ठाकरे, अभय चव्हाण, विमल चव्हाण आदींसह ८९ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.