साटंबा, भांडेगाव, पारोळा, सावा, नवलगव्हाण, जामठी खु. परिसरातील शेतकऱ्यांनी शेतातील वीज बिल न भरल्याने महावितरणने अचानक वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यामुळे १२ फेब्रुवारी रोजी काही शेतकऱ्यांनी आमची काही थकीत रक्कम भरून वीज जोडणी पूर्ववत करण्याची मागणी महावितरणचे अभियंता रायपुरे यांच्याकडे केली; मात्र पूर्ण बिल भरणा केल्याशिवाय वीज जोडल्या जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. शेतकऱ्याचे गव्हाचे पीक हे अंतिम भिजवणीसाठी आले आहे. पावसाळी हंगाम तर शेतकऱ्यांचा पूर्णतः गेला, त्यानंतर कापूस आणि हळदीवर रोग पडल्याने ही पिकेही अर्ध्यावरच आलेत. गहू , हरभरा ही पिके पाण्याअभावी वाळतात की काय? हा प्रश्न पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यानंतर शेतकऱ्यांनी आ. तानाजी मुटकुळे यांची भेट घेऊन समस्या मांडली. मुटकुळे यांनी अधीक्षक अभियंता जाधव यांची भेटून शेतकऱ्यांनी याबद्दल चर्चा करून तीन हजार रुपयांची भरणा केला, तसेच वीज जोडणी करावी, अशी मागणी केली. यावेळी फुलाजी शिंदे, संतोष टेकाळे, गोल्डी सोनी, नारायण खेडकर, गणेश शिंदे, तुकाराम शिंदे, रघुनाथ कराळे, सरपंच गजानन घ्यार, समाधान टापरे, प्रकाश घ्यार, गणेश घ्यार, रमेश टापरे, सारंग घ्यार आदी उपस्थित होते.
वीज तोडल्याने वाळतेय गव्हाचे पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST