कौठा : वसमत तालुक्यातील ग्रामीण भागात कडबा उत्पादन नसल्याने कडब्याला मागणी वाढत आहे. परिणामी, भावही वाढले असून पशुपालक चिंतित आहेत.
गत पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. रखरखत्या उन्हात जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे उन्हाळ्यात चारा साठवण करण्यासाठी पशुपालक शेतकरी धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. कौठा, बोराळा, खुदनापूर, कुरुंदा, गिरगाव, मालवटा, आसेगाव आदी भागांमध्ये गतवर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे आजपर्यंत काही ठिकाणी हिरवा चारा उपलब्ध आहे. परंतु, कोरडवाहू ठिकाणी हिरवा चारा पाहायलाही मिळत नाही.
सद्य:स्थितीत कडब्याचे भाव हे दोन हजार तर अडीच हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे या भागातील पशुपालक वर्ग चिंतित आहे. कोरोना व लॉकडाऊनच्या काळात अगोदरच शेतीचे उत्पादन घटले असल्याने पशुधन जगवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चारा मिळणे झाले कठीण?
या वर्षी पाऊस चांगला झाला असला तरी आज बहुतांश ठिकाणी हिरवा चारा उपलब्ध नाही. चारा मिळत नसल्यामुळे जनावरे विकण्याची वेळ आली आहे. महागामोलाचा कडबा आम्हाला घेणे सध्या परवडेना झाले आहे. पुढे चालून कडबा अजून महाग होण्याची शक्यता असल्याने त्याचा सांभाळ आतापासूनच करीत आहोत.
- रंगनाथ कवठेकर, पशुपालक